Friday, January 27, 2006

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे वाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगु मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नाही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देव, कसं देलं मन
आसं नाही दुनियात
आसा कसा रे तु योगी
काय तुझी करामत!

देवा आसं कसं मनं?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं!

- "बहिणाबाई चौधरी"


खरचं किती यथार्त लिहीले आहे बहिणाबाईंनी, सर्वप्रथम ह्या मनाला आवरायला पाहिजे.

0 Comments:

Post a Comment

<< Home