Friday, January 27, 2006

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
उभ्या पीकातलं ढोर
किती हाकला हाकला
फिरी येतं पिकांवर

मन मोकाट मोकाट
त्याले ठायी ठायी वाटा
जशा वार्‍यानं चालल्या
पान्यावर्‍हल्यारे वाटा

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन?
उंडारलं उंडारलं
जसं वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याचं न्यारं रे तंतर
अरे, इचू, साप बरा
त्याले उतारे मंतर!

मन पाखरु पाखरु
त्याची काय सांगु मात?
आता व्हतं भुईवर
गेलं गेलं आभायात

मन चप्पय चप्पय
त्याले नाही जरा धीर
तठे व्हयीसनी ईज
आलं आलं धर्तीवर

मन एवढं एवढं
जसा खाकसचा दाना
मन केवढं केवढं?
आभायात बी मायेना

देव, कसं देलं मन
आसं नाही दुनियात
आसा कसा रे तु योगी
काय तुझी करामत!

देवा आसं कसं मनं?
आसं कसं रे घडलं
कुठे जागेपनी तुले
असं सपन पडलं!

- "बहिणाबाई चौधरी"


खरचं किती यथार्त लिहीले आहे बहिणाबाईंनी, सर्वप्रथम ह्या मनाला आवरायला पाहिजे.

Tuesday, January 24, 2006

भुतांना उतरवा. . .

काही दिवसांपुर्वी मी राहतो त्या वसाहतीत, पोलिस चौकी जवळील एका चाळी मध्ये एका सातवीतल्या मुलाला भुताने (किंबहुना भुतांनी) झपाटल्याची खबर आली. शाळेतुन येतांना तो निलायम टॉकीज जवळ रस्त्यात लघवी करायला थांबला. तिथे त्याने एका "उतार्‍यावर" लघवी केली. तिथुन तो घरी व्यवस्थित आला, मात्र घरी आल्यावर तो विचित्र वागायला लागला. मग काय सगळ्या वसाहतीत तिच चर्चा. त्या मुलाच्या मानगुटीवर बसलेलं भुत उतरवायला एकच स्पर्धा लागली होती. मुसलमानी फकीर आणले. पण ती भुतं काय काबुत येईनात. मग कोणीतरी सांगितले की त्याला हिजड्यांच्या भुताने झपाटले आहे. ते उतरवायला त्यांच्या पैकीच कोणीतरी लागेल. मग अस कंक्लुजन निघाले की त्याला एका भुताने झपाटले नसुन साधारण 35 भुतांनी झपाटले आहे. एका फकीराने त्यातली 12 भुते उतरविल्याचा दावा केला आणी मोबदला घेउन गेला. उरलेली भुतं ईतर फकीरांच्या व बुवांच्या पोटापाण्याचा विचार करुन, त्यांच्यासाठी ठेउन गेला.
ह्या सर्व कामी वसाहतितील तरुण मुल सुद्धा पुढाकार घेत होती. त्या मुलाला 35 भुतांनी झपाटले आहे म्हणुन त्याचा चिंतेत कट्यावर जमुन विचारविनीमय करत होती.
आपण एकविसाव्या शतकाकडे चाललो आहोत. ईथे बसुन प्रगतीच्या, तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या गप्पा मारतो, आणि आपल्या आजुबाजुला अजुन ही भुतं ववरत आहेत ही खुप खेदाची बाब आहे. अंधश्रद्धा निर्मुलनाचे काम खेड्यांबरोबरच शहरात देखिल करणे खुप गरजेचे आहे असे मला वाटते. खेडेगावांपेक्षा शहरात फोफावणारी अंधश्रद्धा आधी नष्ट झाली पाहीजे. या अशा भुताटक्यांमध्ये पुण्यासारख्या शहरातील तरुण पिढी ओढली जात आहे, त्यांना वेळीच परावृत्त करणे गरजेची आहे असे मला वाटते.
वरील घटना ही सत्य घटना असुन पुण्यातील पर्वतीदर्शन भागात साधारण दोन-एक आठवड्यापुर्वी घडली आहे. अशा घटनी ईथे सतत घडत असतात. येथील बहुसंख्य तरुण मंडळी कपाळाला भंडारा लावुन फिरतांना दिसतील. ईथे बर्‍याच कुटुंबांमध्ये (सुशिक्षीत सुद्धा) मुल जन्माला यायच्या आधिच तिची लिंग तपासणी पर्वती जवळच्या (नाव सांगत नाही) नावाजलेल्या डॉक्टर कडुन करुन घेतात व मुलगी आहे असे निदान झाल्यास गर्भपात करुन घेतात. अंगात देवाची वारी येण हे खुप कॉमन आहे, अगदी इथल्या कही तरुणांच्या अंगात सुद्धा देवाची वारी येतात.
ह्य भुतांना लवकर मानगुटीवरुन उतरविले पाहिजे. . .

Sunday, January 15, 2006

दर्शकहो तुमच्या हाती. . .

माझ्या आधीच्या लेखा बद्दल आशिष दिक्षीत यांनी खालील अभिप्राय नोंदविला आहे:

"त्या वहिनीने ज्याप्रकारे गुडियाच्या खाजगी जीवनात सीमोल्लंघन केले ते कदापि समर्थनीय नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यास हा "बलात्कार" पाहणारे दर्शकही काही प्रमाणात जबाबदार आहेत. तुमच्या एकूण कथनावरून असे वाटते की तुम्हीही हा "बलात्कार" live पाहिलेला आहे. मग तुम्ही दोषी नाहीत का?"

त्यांचे बरोबरच आहे. हा बलात्कार मी सुद्धा पाहिला असल्यामुळे मी सुद्धा काही प्रमाणात दोषी आहे. माझ्या सारख्या अनेक दर्शकानी "तो" बघितल्यामुळे "त्या" वाहिनीची टि.आर.पी. रेटिंग वाढले आणि त्यांना, व इतर काही वाहिन्यांना असे बलात्कार वारंवार करण्याची प्रेरणा मिळाली. माझ्या मते मिडीया जे काही करते ते दर्शकांसाठी करते. त्यामुळे आपण दर्शकच अशा बेलगाम उधळलेल्या अश्वांना लगाम घालु शकतो. त्यांना वेळीच आवरले नाही तर उद्या असे सिमोलंघन करण्याची स्पर्धाच सुरु होईल आणी हे कार्यक्रम आणखी विकृत रुप घेतील.

असेच एका वाहिनीवर मुंबईतील एका लहान मुलीच्या व्यथेचा बजार मांडला होता "सनसनी" म्हणुन. तिला तिच्या वडिलांनी घरात कोंदुन ठेवले होते व वारंवार तिला चटके दिले होते. हा एक कार्यक्रम बघण्याचा गुन्हा सुद्धा मी केला. या कार्यक्रमात दर्शक़ांकडुन प्रतिक्रीया मगविल्या गेल्या. दर्शकांच्या, तिच्या वडिलांबद्दलच्या तिव्र प्रतिक्रियांवर त्या कोवळ्या मुलीकडुन तिची प्रतिक्रीया घेण्याचा अमानुष खेळ जवळपास दिवसभर ती वाहीनी आणी तो पत्रकार करत होते, त्या मुलीच्या भावनांचा, तिच्या मानसिकतेचा विचार न करता. आणि दर्शक सुद्धा उत्स्फुर्त पणे आपल्या प्रतिक्रीया नोंदवित होते.

वाहिन्या, नैतिकता सोडुन इतक्या पुढे जाण्याचे कारण, दर्शकांचा असल्या कार्यक्रमांना मिळणारी पसंतीच आहे. चॅनल्सवरच्या सासु-सुनांच्या भांडणाला, बदल्याच्या प्लॉट्सना टिवीसमोर सर्व काम सोडुन बसुन चविने चघळणार्‍या दर्शकांकडुन दुसरे तरी काय अपेक्षित आहे!

Monday, January 09, 2006

बलात्कार! मीडियाने केलेला

पेपर मध्ये "गुडीया"च्या मृत्युची बातमी वाचली आणि हे चर्चासत्र सुरु करावेसे वाटले. गुडीया केबल टीव्ही बघणार्‍या नागरीकांसाठी अनोळखी नाही. न्युज चॅनल्स बघणार्‍या दर्शकांसाठी तर ती नविन नाहीच. काही महीन्यांपुर्वी एका वृत्त-वाहिनीवर "गुडिया" जवळपास आठवडाभर चर्चेचा विषय होती. तिच्या परिस्थीतीचे वृत्तवाहिन्यांनी अक्षरशा धिंडवडे काढले. जवळपास आठवडाभर स्टुडियोमध्ये वेगळ्या मान्यवरांना बोलावुन त्यावर खमंग चर्चा केली गेली. तिने पहिल्यानवर्‍याकडे परत जावे की दुसर्‍या नवर्‍याबरोबर रहावे ह्या बद्दल लोकांची मत मागितली गेली. मोठी पोलिंग इव्हेंट केली गेली. अगदी, "ग़ुडिया पहिल्या नवर्‍याबरोबर जाईल की दुसर्‍या" अशा जाहिराती करुन त्याबद्दल दर्शकांमध्ये स्पर्धा घेतली गेली. सर्वात कळस म्हणजे तिला स्टुडियोत आणुन सर्व लोकांसमोर, तिच्या दोन्ही नवर्‍यांसमोर खोदुन खोदुन तिचे मत व निर्णय विचारला गेला. तिने पहिल्याबरोबर जाणार असे म्हंटले की, त्यावरुन तिच्यावर प्रश्नांचा भडिमार केला गेला. भारत भरातिल दर्शकांना तिला फोन वरुन प्रश्न विचारायला लावली आणि त्याची तिला उत्तरं देण्यास भाग पाडले गेले. आणि हे सर्व करुन त्या वाहिनेने स्वत:चे टि. आर. पी रेटींग वाढवले.
त्यानंतर आता तिच्या मृत्यची बातमी वाचायला मिळाली. ती आजाराने गेली. मला वाटते, ह्या सर्वास कारणिभुत मिडीया ने केलेला तिच्यावरचा बलात्का आहे. होय.. मी त्याला बलात्कारच म्हणणार. मिडीयाचा गैरवापर करुन एका स्त्रिच्या चारित्र्याचा, तिच्या आत्मसन्मानाचा, तिच्या विचारांचा, तिच्या नात्यांचा आणि तिच्या मनाचा एका वृत्तपत्र-वाहीनिने, स्वत:ची शेखी मिरवण्यासाठी विकृत ध्येयाने पछाडलेल्या काही पत्रकारांनी, स्वत:च्या स्वार्थासाठी केलेला बलात्कार.
आणि त्यात सहभागी झाले, सर्व दर्शक, ज्यांनी चवीने हा बलात्कार होताना बघीतला, ते करणार्‍यांना प्रोत्साहन दिले. मानव हक्क आयोग, स्त्रि हक्क समिती सुद्धा तितकीच दोषी आहे कारण ते या बलात्काराला थांबवु शकले नाहीत, एवढंच नहे तर हा बलात्कार झाल्यावर सुद्धा ते गप्प बसले.

सद्ध्या असे अनेक बलात्कार रोज वृत्तपत्र-वाहिन्या करत आहेत "सनसनी" बातमी करुन.